“किसान दिना”निमित्त चा विशेष लेख
23 डिसेंबर हा भारताचा कृषी दिन. देशातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस “किसान दिवस” म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांचे कैवारी असलेले देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस देशभर साजरा केला जातो. आज अन्नधान्यात भारत स्वयंपूर्ण किंवा आत्मनिर्भर झालेला आहे. तरीसुद्धा अर्थव्यवस्थेतील या महत्त्वाच्या कृषी क्षेत्रासमोर असलेल्या समस्या खूप गंभीर आहेत. किसान दिवसाच्या निमित्ताने समस्यांचा घेतलेला हा वेध.
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रात त्याचप्रमाणे देशाच्या अन्न सुरक्षेमध्ये शेतकऱ्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असल्यामुळे हा दिवस साजरा केला जातो. एका बाजूला पंतप्रधान किसान सारख्या सरकारी योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. गेली काही दशके जागतिक पातळीवर होणारे हवामान बदल, नवनवीन तंत्रज्ञान, शोध आणि शेतकऱ्यांचे दारिद्रय, कर्जबाजारीपणा व आत्महत्यांचे वाढते प्रमाण अशा विविध आव्हानांना सामोरे जात लाखो शेतकरी हा दिवस साजरा करतात. एका बाजूला अन्नधान्य उत्पादनामध्ये भारताने गेल्या काही वर्षात लक्षणीय प्रगती केलेली असून आत्मनिर्भर भारत म्हणून गौरवाने आपण जागतिक अन्न दिन साजरा करत असतो. सध्या भारताचे कृषी उत्पादन 330 दशलक्ष टनांपेक्षा जास्त असून आपण त्यात नवी नवी विक्रम केलेले आहेत. तांदळासारख्या मुख्य धान्याचा एक प्रमुख जागतिक निर्यातदार बनलेलो आहोत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा आपल्या कृषी क्षेत्राने सुनिश्चित केलेली आहे. काही वर्षे कृषि निर्यातीच्या क्षेत्रातही आपण उत्तम कामगिरी केलेली आहे. त्याचवेळी अनेक वर्षे नागरिकांना मोफत अन्नधान्याचे वाटप केंद्र सरकार करत आहे. दुसरीकडे कृषी क्षेत्रासमोर असलेल्या गंभीर समस्या गेल्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कमी झालेल्या नाहीत ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. सत्तेवर आलेल्या विविध पक्षांच्या सर्व सरकारांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध धोरणे राबवली. परंतु त्याला खऱ्या अर्थाने संपूर्ण यश आजतागायत लाभलेले नाही.
